औंधमध्ये अपघातात वृद्धाचा मृत्यू; महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

पुणे, ३१ जुलै २०२५ — औंधमधील नागरास रोडवर खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप पसरला आहे. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या रस्त्यावरील दुर्लक्षितपणावर जोरदार टीका केली आहे.

पिनाक गंगोत्री परिसरात राहणारे हे वृद्ध नागरिक राहुल रेस्टॉरंटजवळील खड्ड्यामुळे पडले आणि गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात टाळता आला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर आज संध्याकाळी ५ वाजता राहुल रेस्टॉरंट, भाले चौक येथे औंध व्यापारी संघटना आणि नागरिक एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करतील व निषेध नोंदवतील.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नाना गोपीनाथ वाळके यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश काळापुरे यांनी सांगितले की, “खड्डे भरून काढणे, स्पीड ब्रेकर बसवणे आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी अनेक वेळा केली, पण कोणतीही कृती झालेली नाही.”

रहिवासी रविंद्र ओसवाल यांनी सांगितले की, “स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांची वाट लागली आहे. पादचारी मार्ग रुंद केले, पण वाहनांसाठी जागा उरलेली नाही.”

नागरिकांनी आता तात्काळ उपाययोजना आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *